Friday, April 5, 2019

सुपीक निओ कॉर्टेक्स पृथ्वीवरच्या सर्व प्राण्यांपेक्षा माणूस हा प्राणी वेगळा आहे.

सुपीक निओ कॉर्टेक्स

पृथ्वीवरच्या सर्व प्राण्यांपेक्षा माणूस हा प्राणी वेगळा आहे.

पृथ्वीवरच्या सर्व प्राण्यांपेक्षा माणूस हा प्राणी वेगळा आहे. याचं कारण मेंदूच्या त्रिस्तरीय रचनेतला वरचा स्तर – निओ कॉर्टेक्स. आकृतीत हा स्तर गडद दिसत आहे. मानवी मेंदूचे एकावर एक असलेले तीन स्तर लक्षात घेतले तर सर्वात खालच्या सरपट मेंदूस्तरात आहे – स्वसंरक्षण. त्यावरच्या म्हणजेच मधल्या आवरणात आहेत- भावना आणि त्या वरच्या तिसऱ्या आवरणात आहेत – विविध भाषा, कला, खेळ, विचार, नवनिर्मिती, संगीत, चित्रकला, विश्लेषण, विवेक, अमूर्त संकल्पना – मूर्त संकल्पना ओळखण्याची क्षमता, आकडेमोड, वस्तूनिर्मितीची क्षमता, समीक्षा, खेळाचे वा नृत्यांमधले नियम इत्यादी. शाळांमध्ये जे विषय शिकवले जातात, त्या सर्वाचा निओ कॉर्टेक्समधल्या घडामोडींशी संबंध असतो.
ज्ञात संशोधनाच्या आधारे असं दिसून आलं आहे की, आफ्रिकेमधील एका बेटावर राहणाऱ्या एप्स या प्रजातीच्या आहारामध्ये अतिशय उच्च दर्जाची प्रथिने आली. यामुळे लिबिक सिस्टीमवर म्हणजेच भावनिक स्तराच्या वर प्रथिनांचं आवरण तयार झालं. या प्रथिनांच्या आवरणामध्ये उच्च बौद्धिक विचार करणारी अनेक क्षेत्रं निर्माण झाली. ही क्षेत्रं इतर कोणत्याही प्राण्यांमध्ये नाहीत.
प्राण्यांची, पक्ष्यांची, कीटकांची देखील एक विशिष्ट भाषा असते. काही प्राण्यांमध्ये उच्च प्रकारच्या बौद्धिक क्षमतांपकी काही क्षमता आढळून येतात. उदाहरणार्थ डॉल्फिन. परंतु मानवी मेंदूशी बरोबरी करू शकेल अशा क्षमता कोणत्याही प्राण्यात नसतात. कारण मानव उच्च प्रतीच्या कल्पना करू शकतो, कल्पनेवर काम करू शकतो, विचार करू शकतो आणि आपले विचार कृतीत आणू शकतो. विविध शोध लावू शकतो. ही निओ कॉर्टेक्सची देणगी आहे.  ‘सरपट मेंदू’, आणि लिबिक सिस्टीम निओ कॉर्टेक्स ही मेंदूची त्रिस्तरीय रचना आपल्यापकी प्रत्येकाला – लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वाना – प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक विचारात मदतीला येत असते.
– श्रुती पानसे
contact@shrutipanse.com
First Published on February 15, 2019 12:02 am
Web Title: neocortex

मेंदूशी मैत्री.. : पहिलं प्रेम : आई – पिल्लाचं! जगातली पहिली प्रेमाची भावना ही आई आणि तिचं पिल्लू यामधली असावी, असं संशोधकांचं मत आहे

मेंदूशी मैत्री.. : पहिलं प्रेम : आई – पिल्लाचं!

जगातली पहिली प्रेमाची भावना ही आई आणि तिचं पिल्लू यामधली असावी, असं संशोधकांचं मत आहे

 श्रुती पानसे
जगातली पहिली प्रेमाची भावना ही आई आणि तिचं पिल्लू यामधली असावी, असं संशोधकांचं मत आहे. ही आई म्हणजे ज्या प्राण्यांमध्ये लिंबिक सिस्टीम (भावनानिर्मितीच्या यंत्रणा) विकसित झाली आहे अशी आई. मांजर, माकड, कुत्रा अशा सस्तन प्रजातीतली आई. पृथ्वीच्या पाठीवर जेव्हा सस्तन प्राण्यांचा जन्म झाला, तेव्हाच प्रेमाची भावना निर्माण झाली. आपल्या पिल्लांबद्दल प्रेम निर्माण झालं. असं प्रेम त्या आधीच्या प्रजातींच्या आई-पिल्लामध्ये आढळून येत नाही.
सस्तन प्राण्यांमध्ये मांजर पिल्लांची काळजी घेते. सुरुवातीच्या काळात पिल्लं तिच्या दुधावर जगतात. ती त्यांच्यावर प्रेम करते. त्यांचं संरक्षण करते. यासाठी ती पिल्लांच्या जागा बदलते. इतर सस्तन प्राणी-आई त्यांच्या मेंदूतल्या यंत्रणेनुसार प्रेम करतात आणि आपल्या पिल्लांची काळजी घेतात. पिल्लं वागायला चुकली, जास्त अल्लडपणा केला, शिकार करताना चुका केल्या तर गुरगुरतात. एवढंच नाही तर स्वसंरक्षण, शिकार अशी काही जीवन कौशल्यंदेखील शिकवतात.
ही पालकत्वाची लक्षणं सस्तन प्राण्यांमध्ये आणि पक्ष्यांमध्ये सुद्धा काही प्रमाणात दिसून येतात. मात्र काही काळाने हे आपलं पिल्लू आहे हे ते विसरून जातात. कारण त्यांच्यातली भावानिक केंद्र आणि स्मरणशक्तीचं केंद्र यांना जोडणारा पूल पूर्ण विकसित झालेला नसतो. कुत्री वासावरून आपलं घर, आपली माणसं लक्षात ठेवतात. कारण नाक आणि स्मरणशक्ती हा पूल मजबूत असतो.  मेंदूच्या त्रिस्तरीय टप्प्यामधला पहिला स्तर आहे- सरपट मेंदू. जिथे स्वसंरक्षण असतं. त्यावरचा दुसरा स्तर आहे- भावनिक मेंदू. लिंबिक सिस्टीम. आकृतीमध्ये हा भाग मेंदूच्या साधारण मधल्या भागात दिसतो आहे. उत्क्रांतीच्या काळात सरपट मेंदूवर प्रथिनांचं आवरण निर्माण होत गेलं. या आवरणामध्ये काही करय वाढली. त्यातलं एक कार्य म्हणजे भावनांची निर्मिती.
सस्तन प्राण्यांमध्ये सरपट मेंदूचा पहिला + भावनिक मेंदूचा दुसरा असे दोन स्तर असतात. त्यामुळे या प्राण्यांचा मेंदू जलचरांपेक्षा अधिक प्रगत आहे.  याशिवाय दुसऱ्या स्तरातली भावनानिर्मितीही असते. माकड, हत्ती अशा सर्व सस्तन प्राण्यांमध्ये स्वत:चं संरक्षण करण्याची प्रबळ भावना असतेच. माणूस या सर्वापेक्षा अजून वरचा आहे. कारण त्याच्या मेंदूत तिसराही स्तर असतो.
contact@shrutipanse.com
First Published on February 14, 2019 1:20 am
Web Title: first love mother puppy

कुतूहल : चिनी कोडी चिनी गणिताला दीर्घ इतिहास आहे. या इतिहासात, इ.स.नंतर दहावे शतक ते तेरावे शतक हा चिनी गणिताचा सुर्वणकाळ मानला जातो.

कुतूहल : चिनी कोडी

चिनी गणिताला दीर्घ इतिहास आहे. या इतिहासात, इ.स.नंतर दहावे शतक ते तेरावे शतक हा चिनी गणिताचा सुर्वणकाळ मानला जातो.

 माणिक टेंबे
चिनी गणिताला दीर्घ इतिहास आहे. या इतिहासात, इ.स.नंतर दहावे शतक ते तेरावे शतक हा चिनी गणिताचा सुर्वणकाळ मानला जातो. अनिर्धार्य (इनडिटरमिनेट) समीकरणांचे विश्लेषण हे चिनी संस्कृतीचे उल्लेखनीय योगदान. अनिर्धार्य समीकरण म्हणजे ज्या समीकरणांची उकल ही एकाहून अधिक प्रकारे होऊ शकते. या अनिर्धार्य समीकरणांवर आधारित, ‘शंभर कोंबडय़ांचा प्रश्न’ हे कोडे चीनमध्ये चौथ्या शतकापासून प्रचलित होते. समजा, बाजारात एका कोंबडय़ाची किंमत चलनाच्या पाच नाण्यांइतकी, एका कोंबडीची किंमत तीन नाण्यांइतकी आणि कोंबडीच्या तीन पिल्लांची किंमत एका नाण्याइतकी आहे. आता जर शंभर नाण्यांत शंभर नगांची खरेदी करायचे असले तर, किती कोंबडे, कोंबडय़ा आणि पिल्ले खरेदी करावी लागतील? तेराव्या शतकात होऊन गेलेल्या यांग हुई याने आपल्या पुस्तकात या गणिताचा उल्लेख केला आहे. यानंतर अशीच गणिते भारतीय गणितज्ञ भास्कराचार्य याच्या बाराव्या शतकातील ग्रंथात, तसेच इटालियन गणितज्ञ फिब्बोनासी याच्या तेराव्या शतकातील ग्रंथात आली आहेत.
चिनी गणितज्ञ सून्झी सुआनजिंग याच्या तिसऱ्या शतकातील ग्रंथातही एका सुप्रसिद्ध चिनी कोडय़ाचा उल्लेख आहे. समजा, आपल्याकडे काही वस्तू आहेत. त्यांची एकूण संख्या माहीत नाही. या एकूण संख्येला तीनने भागले तर बाकी दोन उरते, पाचने भागले तर बाकी तीन उरते आणि साताने भागले तर बाकी दोन उरते. तर वस्तूंची एकूण संख्या किती? हे कोडे ‘चायनीज रिमेन्डर थिअरम’ या प्रमेयावर आधारित आहे. सांकेतिक भाषाशास्त्रातही आज या प्रमेयाचा वापर केला जातो. अंक सिद्धांतामध्ये (नंबर थिअरी) हे प्रमेय अतिशय प्रसिद्ध आहे.
तेराव्या शतकातील गणितज्ञ झु शिजेई यानेही तेरा-चौदाव्या शतकात समीकरण सोडवण्यासाठी उल्लेखनीय पद्धती वापरल्या. शाब्दिक वर्णनात्मक स्वरूपाच्या समस्यांचे, चार किंवा चारहून कमी चलांच्या (व्हेरिएबल) बहुपद (पॉलिनॉमिअल) समीकरणांत रूपांतर करून ती समीकरणे एकेक चल कमी करत सोडवण्याची पद्धत झु याने वापरली आहे. याशिवाय समीकरणे सोडवण्यासाठी सहगुणकांच्या सारणीचाही (मॅट्रिक्स) वापर त्याने केला. ही पद्धत आजही प्रचलित आहे. बीजगणित, अंकगणित यांच्या प्रगतीस हातभार लावणाऱ्या चिनी गणिताने आधुनिक गणितातील अनेक महत्त्वाच्या संकल्पनांची बीजे रोवण्याचे काम केले.
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२
office@mavipamumbai.org
First Published on February 14, 2019 1:17 am
Web Title: article on chinese puzzle

Thursday, April 4, 2019

कुतूहल : भास्कराचार्याचे योगदान गणिताला पुढे नेणारे भास्कराचार्याचे उल्लेखनीय कार्य विविध प्रकारचे आहे.

कुतूहल : भास्कराचार्याचे योगदान

गणिताला पुढे नेणारे भास्कराचार्याचे उल्लेखनीय कार्य विविध प्रकारचे आहे.

भास्कराचार्याचे काल्पनिक चित्र

गणितातील आपल्या भरीव योगदानाने जागतिक स्तरावर भारताचे नाव मोठय़ा उंचीवर नेणारा भास्कराचार्य (दुसरा) हा गणितज्ञ बाराव्या शतकात होऊन गेला. इ.स.नंतर पाचव्या शतकापासून सुरू झालेल्या आर्यभट, ब्रह्मगुप्त, महावीर अशा भारतीय गणितज्ञांच्या परंपरेतील भास्कराचार्याने, गणिताचे आणि खगोलशास्त्राचे अध्ययन, अध्यापन व संशोधन केले. भास्कराचार्याच्या सुप्रसिद्ध ‘सिद्धांतशिरोमणी’ ग्रंथाचे चार भाग असून त्यापैकी लीलावती व बीजगणित हे दोन भाग गणितासंबंधी, तर ग्रहगणिताध्याय व गोलाध्याय हे दोन भाग खगोलशास्त्रविषयक आहेत. लीलावती भागाचे अनेक भाषांत रूपांतर झाले आणि ते पाठय़पुस्तक म्हणून सुमारे पाच शतके भारतात वापरले गेले.
गणिताला पुढे नेणारे भास्कराचार्याचे उल्लेखनीय कार्य विविध प्रकारचे आहे. भास्कराचार्याने अपरिमेय (इरॅशनल) संख्यांच्या, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग आणि वर्गमूळ या सहा प्रकारच्या क्रियांचे स्पष्टीकरण दिले. एखाद्या संख्येला शून्याने भागल्यास येणाऱ्या राशीला ‘खहर’ राशी ही संज्ञा त्याने दिली. गणिती अनंताच्या (इन्फिनिटी) कल्पनेच्या दिशेने होणारी ही वाटचाल होती. बीजगणितातील अव्यक्तांसाठी (अननोन) क्ष, य अशा प्रकारची अक्षरे मानण्याची पद्धत भास्कराचार्यानेच सुरू केली. क्ष आणि य असे दोन अव्यक्त असलेली अनिर्धार्य (इंडिटरमिनेट) समीकरणे सोडवण्याचे आधीच्या भारतीय गणितज्ञांचे प्रयत्नही त्याने पूर्ण केले. तसेच त्याने क्ष आणि य असे दोन अव्यक्त असणारी द्विघाती (क्वाड्रॅटिक) अनिर्धार्य समीकरणे सोडवण्यासाठी चक्रवाल (सायक्लिक) पद्धत तयार केली.
भास्कराचार्याने गणिताच्या व्यावहारिक उपयोगांनाही महत्त्व दिले. भूमितीत पायथॅगोरसच्या सिद्धांताची सोपी सिद्धता दिली. वर्तुळाच्या संदर्भात ‘परीघ भागिले व्यास’ हे गुणोत्तर देताना २२/७ ही स्थूल किंमत, तसेच ३९२७/१२५० ही सूक्ष्म किंमतही त्याने दिली. आधुनिक काळात स्वतंत्रपणे नावारूपाला आलेल्या काही गणित शाखांची बीजे भास्कराचार्याच्या सूत्रांमध्ये आढळतात. गोलाचे पृष्ठफळ व घनफळ काढण्याची सूत्रे आधुनिक समाकलन (इंटिग्रेशन) पद्धतीने त्याने दिली. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा उल्लेख त्याने ‘आकृष्टशक्ती’ असा केला आहे. पृथ्वीला भूगोल म्हणताना, पृथ्वी गोल असूनही सपाट का भासते, याचे सुगम विवेचनही त्याने केले. ग्रहांची गती मोजण्यासाठी त्याने, आधुनिक कलनशास्त्रातील कल्पनांचा वापर केला. खगोलशास्त्रातील गणितात रस घेणाऱ्या भास्कराचार्याने, गणिती आणि खगोलशास्त्रीय मापनांसाठी काही उपकरणेही विकसित केली.
– डॉ. मेधा श्रीकांत लिमये
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 
office@mavipamumbai.org
First Published on February 13, 2019 1:04 am
Web Title: bhaskaracharya contribution to mathematics

मेंदूशी मैत्री.. : ‘मी’ हे केंद्रस्थान प्रजोत्पादनाची साखळी चालू ठेवणं हे कार्यदेखील सरपट मेंदू करतो.

मेंदूशी मैत्री.. : ‘मी’ हे केंद्रस्थान  

प्रजोत्पादनाची साखळी चालू ठेवणं हे कार्यदेखील सरपट मेंदू करतो.

कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगात प्रत्येक जण स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. एक दिवसाचं बाळही स्वत:चा जीव वाचवण्याच्या उद्देशाने भूक लागली की रडत असतं. असं कशामुळे घडतं? प्रत्येक जीव स्वत:ला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, यावरच आजवर सजीव सृष्टी तग धरून आहे. लहानशा मुंगीपासून बलाढय़ हत्तीपर्यंत आणि बुद्धिमान माणसापर्यंत हाच गुणधर्म दिसतो. अस्तित्व टिकवणं हे मेंदूचं मूलभूत कार्य आहे.
जलचर आणि सरपटणारे प्राणी हे पृथ्वीवरचे पहिलेवहिले सजीव. या प्राण्यांच्या मेंदूला रेप्टिलिअन ब्रेन असं नाव दिलेलं आहे. या आकृतीत हा भाग गडद दाखवला आहे.
हाच सरपटणाऱ्या प्राण्यांचा मेंदू. डॉ. पॉल मॅक्लीन यांनी मांडलेल्या त्रिस्तरीय मेंदूसिद्धांतातला (ट्रय़ून ब्रेन थिअरी) हा आहे पहिला आणि सर्वात खालचा स्तर. याद्वारा मेंदू अनेक कामं करत असतो. यातलं एक महत्त्वाचं काम म्हणजे स्व-संरक्षण. आपल्यापेक्षा लहान प्राणी दिसला तर अन्नग्रहणासाठी त्याच्यावर हल्ला करायचा आणि जर आपल्यापेक्षा आकाराने मोठा प्राणी दिसला तर त्याच्यापासून स्वत:ला वाचवायचं. या कार्यामुळे अस्तित्व जपण्याचं महत्त्वाचं काम ‘सरपट मेंदू’ करतो.
प्रजोत्पादनाची साखळी चालू ठेवणं हे कार्यदेखील सरपट मेंदू करतो. यासाठी हे आदिम जीव सुरक्षित ठिकाणी अंडी घालतात. उदाहरणार्थ मासे, कासव. मात्र एकदा अंडी देऊन झाली की, अंडय़ातून पिल्लं बाहेर पडतात. जन्मदाते त्यांना पुन्हा भेटत नाहीत, त्यांची काळजी घेत नाहीत. त्यांना खाणं आणून भरवत नाहीत. लाड करत नाहीत. ही पिल्लं आपापलं जीवन जगायला लागतात. स्वत:च्या अस्तित्वाची लढाई स्वत: लढतात. त्यांच्या मेंदूच्या यंत्रणेत हेच आहे.
अंडी फुटून पिल्लं बाहेर आल्यावर जलचर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या काही अपवादात्मक प्रजाती मात्र पिल्लांचं संरक्षण करताना दिसतात. मात्र ती प्रेम, माया यासाठी नाही तर प्रजोत्पादन, वंशसातत्य राखणं हे काम करण्यासाठी! प्रेम, माया, राग अशा कोणत्याही भावनांची केंद्रं सरपट मेंदूमध्ये नसतात. नाग रागाने फूत्कार मारत नाही, साप डूख धरत नाही किंवा मुंगी त्वेषाने चावत नाही. जीव संकटात आहे याची जाणीव झाल्यामुळे ते स्वत:चं संरक्षण करतात.
मात्र, माणसाच्या मेंदूतली गुंतागुंत काही वेगळीच!
–  श्रुती पानसे contact@shrutipanse.com
First Published on February 13, 2019 1:02 am
Web Title: the basic function of brain

कुतूहल : ऋणसंख्या ऋणसंख्यांचा खरा स्वीकार सातव्या शतकात शून्याची संकल्पना विकास पावल्यावर झाला.

कुतूहल : ऋणसंख्या

ऋणसंख्यांचा खरा स्वीकार सातव्या शतकात शून्याची संकल्पना विकास पावल्यावर झाला.

ऋणसंख्यांच्या संकल्पनेचा उदय आणि विस्तार गणितालाच नव्हे, तर सर्वच विज्ञानशाखांना उपयुक्त ठरला. ऋणसंख्यांचे अस्तित्व सामान्य अर्थाने, एखाद्या लहान संख्येतून मोठी संख्या वजा करण्याच्या क्रियेद्वारे दिसून येते. ऋणसंख्या दर्शवण्यासाठी त्या संख्येआधी (-) हे चिन्ह वापरले जाते. धनसंख्या आणि ऋणसंख्या परस्परविरुद्ध अर्थाने आज अनेक संदर्भात रूढ आहेत. उदाहरणार्थ, पाण्याचा गोठणिबदू शून्य अंश सेल्शिअस मानला जातो आणि त्याखालील तापमान ऋण मानले जाते. प्राचीन संस्कृतींमध्ये धनसंख्यांची संकल्पना स्थिरावल्यावरही, बराच काळ ऋणसंख्यांच्या रूपात एखाद्या प्रश्नाचे उत्तर स्वीकारले जात नव्हते. चिनी संस्कृतीमध्ये इ.स.पूर्व २०० सालाच्या सुमारास व्यापाराच्या निमित्ताने होणाऱ्या आकडेमोडीसाठी धन आणि ऋणसंख्या अनुक्रमे लाल आणि काळ्या रंगाच्या कांडय़ांनी दर्शवल्या जात होत्या. पेशावरजवळील बक्षाली येथे सापडलेल्या, तिसऱ्या-चौथ्या शतकातील हस्तलिखितात, संख्येच्या पुढे सध्याच्या ‘अधिक’ या चिन्हाचा उपयोग करून ऋणसंख्या दर्शवलेल्या आढळतात.
ऋणसंख्यांचा खरा स्वीकार सातव्या शतकात शून्याची संकल्पना विकास पावल्यावर झाला. ब्रह्मगुप्ताने इ.स.नंतर सातव्या शतकात लिहिलेल्या ‘ब्राह्मस्फुटसिद्धांत’ या ग्रंथात दोन ऋणसंख्यांची बेरीज ऋण असते, दोन ऋणसंख्यांचा गुणाकार धन असतो, इत्यादी अंकगणिती नियम स्पष्टपणे दिले. संस्कृतमध्ये ‘ऋण’ शब्द कर्ज या अर्थाने येतो. त्यामुळे ब्रह्मगुप्तानेही ऋण आणि धनसंख्यांचा विचार क्रमश: कर्ज आणि उत्पन्न या संदर्भातच केला. पुढे नवव्या शतकापासून अरब गणितीही शून्यापेक्षा लहान अशा ऋणसंख्यांचे अस्तित्व मान्य करू लागले. युरोपमध्ये सतराव्या शतकात जॉन वॅलिस याने ऋणसंख्यांना संदर्भरेषेवर स्थान दिले आणि ऋणसंख्यांचा समावेश गणिताच्या अभ्यासात झाला. त्यानंतर ऋणसंख्यांचे वर्गमूळ काढण्याच्या गणिती गरजेपोटी कल्पित (इमॅजिनरी) संख्यांची संकल्पनाही उदयाला आली.
अठराव्या शतकापासून ऋणसंख्यांसंबंधीच्या गणिती क्रियांचा अभ्यास विशेषत्वाने सुरू झाला. त्यामुळे या संख्यांची उपयुक्तता विविध क्षेत्रांत झपाटय़ाने वाढत गेली. आज अनेक प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखांत तसेच बँक व्यवहार, ताळेबंद यासारख्या अर्थव्यवहारांमध्ये ऋणसंख्या मोठय़ा प्रमाणावर वापरल्या जातात. गणित आणि त्यावर आधारित विकासाला ऋण संख्यांनी आपल्या ऋणात ठेवले आहे!
– डॉ. मेधा श्रीकांत लिमये
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org
First Published on February 12, 2019 1:04 am
Web Title: negative number

मेंदूशी मैत्री.. : मेंदू आणि हृदय इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, मेंदू हा विचार करणारा एकमेव अवयव आहे.

मेंदूशी मैत्री.. : मेंदू आणि हृदय

इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, मेंदू हा विचार करणारा एकमेव अवयव आहे.

श्रुती पानसे contact@shrutipanse.com
‘माझा मेंदू आणि माझं हृदय यामध्ये संघर्ष चालू आहे’, ‘हृदयाचं म्हणणं मेंदू मान्य करत नाही’, ‘दिमागसे सोचो, दिलसे नही’ अशा प्रकारची वाक्यं अनेक जण करत असतात. हृदयाने विचार करणं म्हणजे भावनांना झुकतं माप देणं आणि मेंदूने विचार करणं म्हणजे तर्काने विचार करणं, असं काहीसं या वाक्यांमधून ध्वनित होतं. हृदय आणि मेंदू यातलं नातं नक्की काय आहे? दिल और दिमाग हे वेगळे आहेत का?
इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, मेंदू हा विचार करणारा एकमेव अवयव आहे. कारण न्यूरॉन्स या ‘शिकणाऱ्या पेशी’ फक्त मेंदूत असतात. इतर कोणत्याही अवयवात नाही. प्रत्येक विचार हा मेंदूत तयार होतो. हा विचार संदेशरूपाने विविध, संबंधित अवयवांपर्यंत पोहोचवला जातो. यावर संबंधित अवयव योग्य ती अंमलबजावणी करतो.
आजवरच्या संशोधनातून असं लक्षात आलं आहे की, तर्कशुद्ध विचार, विश्लेषण करणारी क्षेत्रं मेंदूच्या डाव्या गोलार्धामध्ये आहेत. तर भावनांशी संबंधित केंद्रं ही उजव्या गोलार्धामध्ये आहेत. एखाद्याने भावनांच्या बाजूने निर्णय घेतला तर नक्की विचार केला आहेस ना? असं विचारलं जातं. (कदाचित डाव्या गोलार्धातल्या क्षेत्रांमधली तर्कशुद्धता वापरली गेली नसेल तर?) याउलट भावनांचा जराही विचार न करता केवळ तर्कशुद्ध निर्णय घेतला असेल तर, ‘किती हा कोरडेपणा?’ असं म्हटलं जातं.
आयुष्यातले काही निर्णय प्राधान्याने केवळ डाव्या गोलार्धातल्या क्षेत्रांनुसार विचार करून (बोलीभाषेत सांगायचं तर – काळजावर दगड ठेवून) आणि काही निर्णय उजव्या गोलार्धानुसार (भावनांच्या आहारी जाऊन) घेतले जाऊ शकतात. मात्र ज्यामध्ये दोन्हीचा सारासार विचार करून निर्णय घेतलेले असतील तर ते जास्त योग्य ठरतात.
उदा. झालेल्या घटनेचा अभ्यास आणि विश्लेषण करून डाव्या गोलार्धाचा वापर करून न्यायाधीश निर्णय घेतात, शिक्षा सुनावतात. त्या वेळी उजव्या गोलार्धातून आरोपीच्या भावनांचा विचार करत नाहीत. मात्र याच आरोपीने पुढे दयेचा अर्ज केला तर हा निर्णय राष्ट्रपतींनी उजव्या गोलार्धाचा विचार करून घ्यावा, अशी आरोपीची अपेक्षा असते. यावर राष्ट्रपती दोन्ही गोलार्धाचा वापर करून म्हणजेच सारासार विचार करून निर्णय घेतात. सर्व  निर्णय मेंदूच घेतो, हृदय नाही!
First Published on February 12, 2019 1:02 am
Web Title: brain and heart